Wednesday, October 28, 2020

मन हरवून टाकणाऱ्या भिगवनचा अनुभव

तुम्हाला कधी असं जाणवलंय की तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखाद्या दिवसाच्या अनुभवात इतके डुंबून जाता की दोन तीन दिवस त्यातून बाहेर पडत नाही. मी असा दिवस नुकताच जगलो.
मागचा रविवार ( दिनांक २९ - ११ - २०१५ ) मला अजूनही आठवतोय. निशब्द करून टाकतो. खरंतर इतरांसाठी अजिबात वेगळा न वाटणारा तो अनुभव मात्र मी अगदी पहिल्यांदाच घेतला होता.
शनिवारी आमचा म्हणजे आमच्या Shutterbugs ग्रुपचा दुसऱ्यादिवशी अर्थात रविवारी भिगवणला जायचा बेत ठरला. मी सोडून सगळे बर्ड फोटोग्राफर. मला लँड्सकेप फोटोग्राफी आवडते. आणि भटकंती सुद्धा. आधी ठरलं सकाळी सहाला पुण्यातून निघायचं. पंकजने सल्ला दिला की सूर्योदयाच्या आधी पोचलात तर खूप चांगले फोटो काढायला मिळतील. पुणे ते भिगवणचे अंतर पाहता ज्याठिकाणी फोटोग्राफीसाठी पोचायचं तिथपर्यंत जायला दोन सव्वादोन तास तरी लागणार होते. योगेशच्या कार मधून जाणार होतो. सूर्योदय साधारण ६.३० ते ६.४५ च्या दरम्यान असतो याची कल्पना आम्हाला होतीच. म्हणजे आम्हाला पहाटे चारला पुण्यातून निघणे भाग होते. आणि बाकीचे संमत झाले. हे सगळं व्हाट्सअप्प ग्रुप वरील गप्पांमध्ये ठरलं. ' झोपा आता ' कुणीतरी मेसेज टाकला. ' कार्ड मोकळं करा आणि बॅटरी चार्जिंगला लावा ' दुसऱ्याने मत मांडलं आणि सगळे गायब झाले. साडेअकरा वाजून गेले होते. मी मोबाईलच्या घड्याळात तीनचा आणि तीन दहा चा असे दोन गजर लावले. आणि पुढील दोन तीन मिनिटात झोपलो देखील.
बरोबर पहाटे तीनला जाग आली. मोबाईल मध्ये पाहिलं तर लक्षात आलं की मी गजर वाजण्याची वाट पाहिली असती तर वेळेत उठलोच नसतो. गजरची वेळ दुपारची दाखवत होती. नेहमीसारखं मी चुकीचा गजर लावला होता.
पटकन उठून आवरलं. कॅमेऱ्यात कार्ड आणि बॅटरी तपासली. पाण्याची बाटली आणि थोडं खाणं बॅगेत टाकलं. अंगात थंडीतलं जॅकेट लटकवून बॅग अडवली व घरातून ३.५० ला बाहेर पडलो. बाहेर अंधार. पहिल्यांदाच इतक्या पहाटे मी घरातून बाहेर पडत होतो. भटक्या कुत्र्याचा विचार मनात आला. काही झालं तरी गेलंच पाहिजे. पण जाताना एकही कुत्रं दिसलं नाही. कारण नुकतीच थंडी पडायला लागली होती (जरा उशिराच म्हणजे एक महिना उशिरा).
सिंहगड रोड वरील संतोष हॉलच्या समोर सत्यजित, योगेश आणि आशु थांबले होते.
२० वर्षांपूर्वी मी पुण्यात आलो तेंव्हा योगेशची ओळख झाली होती. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. सत्यजितची ओळख यावर्षीची, जानेवारीत वाकडच्या बागेत आम्ही फोटो काढायला गेलो होतो तेंव्हाची. योगेश आणि सत्या पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. आशु आणि सत्याची ओळख अशीच फोटोग्राफी दरम्यान झालेली. विरेशही चालत तिथे पोचला. आशु आणि विरेश ची ओळख झाली. बॅगा गाडीत टाकल्या आणि लगेच निघालो, तरी ४.२० झालेच होते.
गाडीत गप्पा रंगल्या. सत्यासोडून सगळे मराठी बोलणारे. सत्या कोलकत्याचा. म्हणून जास्तीतजास्त हिंदीत बोलणं पण मराठीत बोलणं थांबलं नाही. आताकुठे सत्याला मराठी थोडं कळू लागलंय. पण तो हिंदीतून दाद देत होता.
योगेशची ड्रायविंग मस्त आहे. सुसाट चालवतो पण अगदी योग्यठिकाणी वेग कमी देखील ठेवतो. उगाच वेडीवाकडी नाही चालवत. चार चाकी गाडीच्या प्रवासाचा अनुभव नसलेल्या आशूला काही सुचत नव्हतं. त्याच्याबाजूची काच थोडी खाली करूनच बसला. आम्ही अगदी वेळेत पोचलो गप्पा मारतामारता कधी पोचलो काहीच कळालं नाही. त्यात सगळीकडे अंधार. गूगल मॅप वरून अंदाज घेऊन भिगवनचा शोध लावला. रात्रीच पंकजकडून तेथील गाईडचा म्हणजे संदीप नगरेचा नंबर घेतला होता त्याला पुढील रस्ता विचारला. तो तयारच होता. आम्हाला फ्रेश होण्यास सांगितले पण सूर्योदयापूर्वी आम्हाला जागेवर जायचं होतं. त्याने त्याच्या माणसाला आमच्या गाडीतून जायला सांगितलं. आणि आम्ही पोचलो.
पूर्वेला गुलाबी झाक दिसत होती. लक्षात आलं की सूर्य त्याचं दर्शन द्यायला निघालाय. पूर्वेला थोडे ढगही होते. अगदी पुढील दहा मिनिटे तरी सुर्योदयाला वेळ होता. समोर अथांग समुद्रासारखं पाणी आणि त्यात काही होड्या. केक वर आयसिंग असावं तसं पाण्यात आकाशातील गुलाबी छटेचं प्रतिबिंब. सगळीकडे निळसर धुकं. अगदी तृप्त झालो. कॅमेरा सज्ज करून वेळ न घालवता चारपाच फोटो काढले.

इतरांकडे माझं लक्ष नव्हतं. ते चौघे एका बोटीत जाऊन बसले. मला सत्याने हाक मारली व म्हणाला,' जल्दी आ जाओ, हम बोट में जा रहे है।' आणि मी हादरलो. अरे बापरे! होडीतून प्रवास करायचा? एक मिनिटभर मला काही सुचलंच नाही. सगळे बोलवत होते.
मला पोहता येत नाही. तीन चार वेळा प्रयत्न करून सुद्धा मला कधीच पोहायला जमलं नाही. माझे वडील आणि सगळे भाऊ पट्टीचे पोहणारे. मी पाण्यात जायला घाबरतो. समुद्रात गेलो तरी फारतर फार गुढगाभर पाण्याच्या पुढे जात नाही. होडीचा प्रवास नेहमी टाळतो. बुडाली तर काय?असा नेहमी नकारात्मक विचार मनात येतो.
मी आधी सगळ्यांना नाही म्हणालो. योगेशने धीर दिला आणि त्याला सुद्धा पोहता येत नाही हे सांगून टाकले. असेलनसेल तितका धीर एकवटून होडीत चढलो आणि लगेच दिसेल त्याठिकाणी पटकन बसलो. बोटीत जेंव्हा तो गाईड चढला तेंव्हा बोट थोडी हेंदकाळली. आणि माझा जीव वर खाली झाला. दोन्ही बाजूला हात घट्ट पकडून बसलो. फोटो काढायचं भान राहिलं नाही.
पाणी शांत होतं. होडी हळूहळू पुढे सरकत होती. जास्ती हलत नव्हती म्हणून जीवातजीव आला. पुन्हा कॅमेरा हातात घेऊन फोटो काढायला सुरवात केली.

होडीचा वरील काठ पाण्याच्या पातळीच्या थोडा वर होता. अथांग पाण्याची पातळी बघून थोडं मस्त वाटत होतं. त्यात सूर्य दर्शनाची वेळ जवळ येत होती. गुलाबी छटा अजून गडद झाली होती. असं वाटत होतं की आजूबाजूचा परिसर फोटो काढून घेण्यासाठी तयार होऊन बसला आहे. पाण्याच्या पातळीच्या इटक्याजवळून तेही पाण्यात (म्हणजे होडीत) बसून फोटो काढण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. त्यात होडीचा प्रवासही पहिलाच. अगदी सुखद. मनोहारी सभोवतालच दृश्य बघून माझ्यातला मी हरवून गेलो. सतत कॅमेरातील सेटिंग बदल फोटो काढत होतो. आमच्याभोवती कितीतरी वेगवेगळे पक्षी होते. काही आधीच पोचले होते तर काही कळपाकळपानेे येत होते. काही पक्षी पाण्यात उतरताना खुपवेळा मी पाहिले होते, पण ज्याठिकाणी पाण्यात सूर्योदयाच्या बाजूच्या रंगांच्या छाटांचे प्रतिबिंब पडले होते त्यात त्यांचं येऊन उतरणं मी पहिल्यांदाच बघत होतो. जणू काही ते सर्व सुर्यनारायणाचे स्वागत करण्यासाठी जमा होत आहेत. भान हरपून जावं अशी दृष्ये समोर होती.

प्रत्येक दृष्य कॅमेराबंद करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. प्रत्येक क्षण वेगवेगळे अनुभव देत होता. डोळ्याचं पारणं फिटलं आणि कॅमेऱ्यातील शटर सुद्धा वरखाली करून कंटाळून गेलं असेल.
आणि सुर्यनारायण ढगाआडून बाहेर आले. त्यांची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली. तसं पाण्यातील प्रत्येक लहर सोनेरी रंगात उजळून निघाली. लांबपर्यंत दिसणारी ती पाण्यावरील सोनेरी रेघ डोळे दिपवून टाकणारी होती. कॅमेरा थोडावेळ बंद करून तो क्षण नजरबंद केला. अगदी स्तब्द झालो. मी माझा राहिलोच नाही. कुठे हरवलो कोण जाणे! ते काही क्षण खरंच जगलो.

योगेशने थोडं हलवून मला भानावर आणलं आणि ज्यागोष्टींचे फोटो काढायला आम्ही इथंवर आलो होतो तिकडे बोट दाखवलं. अग्निपंख किंवा फ्लेमिंगो.
उंचच्या उंच त्या सुंदर पक्षांच्या दिशेने आम्ही पुढे सरकत होतो. पांढराशुभ्र, पंखावर रक्तवर्णी छटा, थोडी वाकडी पण गुलाबी चोच, पिवळे डोळे, लांब मान आणि काड्यांसारखे गुलाबी पाय. पाच सहा फूट उंचीचे ते सुंदर पक्षी मी यापूर्वी फक्त फोटोतच पाहिले होते. आता प्रत्यक्षात ते समोर पाहून मतीगुंग झाली. कॅमेरा सरावून फोटो काढायला सुरु केलं. मोजकेच फोटो काढले. फोटोग्राफीचा अजून अनुभव कमी असल्याची जाणीव झाली. अशा उंच पक्षाचे फोटो कसे काढायचे तेच कळत नव्हतं. दुसऱ्या काही फोटोग्राफरची होडी फार जवळ गेली तसे पहिला ग्रुप पटपट उडून गेला. मग दोन्ही होड्या दुसऱ्या ग्रुप कडे वळाल्या. आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. फोटो काढणं चालूच होतं. कॅमेराच्या आय-पीस मधून पाहून फोटो काढताना आम्ही फ्लेमिंगोच्या किती जवळ गेलोय हे कळालं नाही. सेटिंग बदलण्यासाठी कॅमेरा डोळ्यापासून दूर केला तेंव्हा जाणवलं की आम्ही त्या फ्लेमिंगोना कवेत घ्यायला चाललोय.

 इतक्या जवळ गेल्यामुळे तो ग्रुप देखील बिथरला. मी लगेच सगळ्यांना हळू आवाजात बोललो की ते आता उडणार आहेत. ज्यांना लक्षात आलं त्यांनी त्यांच्या कॅमेराचे सेटिंग पटकन बदलले आणि मीच बदलायचं विसरलो. पुढच्या चार पाच सेकंदात त्यांनी दोन चार पावले पळत उड्डाण केलं. मी शक्य तितका प्रयत्न केला. कॅमेरा हलू नये याचा खटाटोप करत होतो पण होडी थोडी हलतच होती. पाच सहा सेकंदांचा खेळ.

 तो फ्लेमिंगोंचा कळप खूप दूर जाऊन बसला. आमच्यापैकी कोणीही बोलत नव्हतं. सगळेजण आपापल्या कॅमेरात डोकाऊन बसलेलो. बघत होतो की आम्हाला योग्य असे फोटो काढता आलेत की नाही. पण कॅमेराच्या छोट्या स्क्रीन वर लक्षात येत नव्हतं. घरी गेल्यावर लॅपटॉपच्या स्क्रीनवरच कळू शकणार होतं.
आमच्या गाईडने होडी परतीच्या मार्गावर आणली. जाताना काही सी गल नावाचे पक्षी इकडे तिकडे फिरताना दिसत होते. सुंदर पक्षी. मासेमारीत तरबेज. फ्लेमिंगो आणि सी गल हे दोन्ही स्थलांतरित पक्षी. तसे बरेच आहेत. मला फारशी माहिती नाही. त्यांचे आगमन साधारण नोव्हेंबर च्या दरम्यान होते व गमन शक्यतो मार्च मध्ये. पण उन्हाळा जर लवकर सुरु झालातर लवकर ही जातात. हे पक्षी उत्तरेकडून हजारो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे म्हणजे भारतात किंवा दक्षिणी आशिया खंडात कसे काय येतात हे मला नेहमी पडलेलं कोडं! सी गल चे काही उडतानाचे किंवा मासेमारी करतानाचे फोटो काढले. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला, त्यामुळे फोटो थोडे चांगले निघालेत असं जाणवलं.

पोटात कावळे जोरजोरात ओरडत होते. घरातून निघाल्यापासून आम्ही फक्त एका चहाच्या कपावर समाधान मानलं होतं. आम्ही संदिप नगरे च्या म्हणजे आमच्या गाईड च्या घरी परतलो. आधी पोहे आणि नंतर ऑम्लेट वर ताव हाणला. चहा घेतला आणि पुढच्या स्थळी रवाना झालो. पुन्हा होडीतून प्रवास होता. सवय पडल्यासारखी मी पण लगेच तयार झालो. पण थोडी धाकधूक होतीच. यावेळी संदीप ने दुसरा गाईड सोबत दिला.
थोडं चालून होडीच्या ठिकाणी पोचलो. पाण्यात आधीपेक्षा खळखळाट जास्ती होता. पुन्हा धीर एकवटून होडीत बसलो ज्यात कुठूनतरी थोडं थोडं पाणी झिरपत होतं. ते बघून कसाबसा गोळा केलेला धीर कुठेतरी पळून गेला. पण त्या गाईड ने थोडा धीर दिला. योगेश सुद्धा थोडा घाबरलेला वाटला. पण तरी आम्ही गप्प बसलो. गाईड ने होडी पाण्यात लोटली आणि आमचा हेंदकाळत प्रवास सुरु झाला. आता आम्ही नदीच्या पात्रातून जात होतो आणि जिथे पाणी वाहत होते त्याच्या थोडं विरुद्ध दिशेने जात होतो. होडी प्रचंड हालत होती आणि मी अतिशय कासावीस झालो. गाईड ने सांगितलं की आपण नदी पार करून दुसऱ्याबाजूला काही त्याच भागात दिसणारे पक्षी पाहून येऊ. हेंदकाळत जाणाऱ्या होडीत मी फोटो काढण्यापेक्षा बाजूच्या फळीला घट्ट पकडून ठेवणं पसंद केलं. उगाच मनात सारखी शंका येत होती की होडीतलं पाणी वाढायला लागलंय. प्रचंड घाबरलेलो. बाकीचे फोटो काढताकाढता माझ्याकडे बघून हसत होते. माझा सारखा परत चला चा घोषवारा सुरु होता. पण कुणीही दाद देत नव्हते. होडीतून खाली उतरेपर्यंत मी एकही फोटो काढला नाही. दुसऱ्या किनाऱ्यावर उतरल्या उतरल्या मी गाईडला विचारले चालत जाण्याचा मार्ग आहे का? त्यावर त्याने सांगितले की सात आठ किलोमीटर चालावे लागेल. त्या उत्तरावर मी गप्प झालो. म्हटलं आपण काहीतरी शोध लावू.
गाईड, सत्या, विरेश आणि आशु पुढे फोटो काढायला गेले. मी आणि योगेश तिथेच थांबलो. योगेशच्या घशाला कोरड पडली होती आणि आम्ही पाणी आणायचं विसरलो होतो. लांबवर होड्यांमध्ये काही लोकं काम करताना दिसत होती. मी आणि योगेश तिकडे जायला निघालो. मनात विचार आला की परतीचा चालत जाण्याचा मार्गदेखील शोधू. पुढे गेलो पण मार्ग काही जवळ असण्याची चिन्हेपण दिसली नाहीत आणि त्या होड्या देखील आत पाण्यात असल्याचं जाणवलं. मग काहीही विचार न करता परत आमच्या होडीकडे परतलो. बाकीचे परतले. मगाशी जोरात वाहणारा वारा थोडा शांत झाला होता. कदाचित परतीचा दुसरा मार्ग न सापडल्याने मला वारा जास्ती जाणवला नसेल. परतताना होडी देखील कमी हालत होती. कसं असतं ना! संकटाला तोंड देण्याची एकदा का माणसाच्या मनाची तयारी झाली की पुढच्या संकटाची भीती कमी वाटू लागते. कदाचित माझं तसं झालं असेल किंवा खरंच होडीचं हेंदकाळनं कमी झालं असेल.
एकदाचे पूर्वीच्या जागी सुखरूप पोचलो. संदीप च्या घरी पोचलो. जेवणाची व्यवस्था त्याने करूनच ठेवली होती. तुडुंब जेवलो. शाकाहारी जेवण. गावाकडचा मस्त बेत. वांग्याची पातळ भाजी, टोमॅटोची सुकी भाजी, कांदा भजी, भाकरी, वरण भात. सोबतीला चिरलेला टोमॅटो आणि काकडी, दही, छोटे पापड आणि लोणचं.


आम्ही काहीच बोलत नव्हतो. तोंडाची आणि हाताची जुंपली होती. चव इतकी सुरेख की पोट नको म्हणत होतं पण तोंड थांबत नव्हतं. अगदी तृप्त झालो.
संदीप बरोबर ओळख वाढली. कळालं की त्याच्याकडे राहायची सोय देखील आहे आणि ती देखील कमी किमतीत. बील त्यामानाने खूप कमी झाले. दोन वेळा होडीतील दीड दीड तासांचा प्रवास, पक्षांची माहिती, सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि खूप सुंदर असा अनुभव. पाच जणांमध्ये फक्त दोन हजार रुपये. लगेच देऊन, संदीप बरोबर फोटो काढून आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागलो.

येताना गाडीत फारसं कुणी बोलत नव्हतो. आम्ही आमचे फोटो कॅमेराच्या छोट्या स्क्रीन वर बघत एकमेकांना दाखवत होतो आणि शाबासकी मिळवत होतो. योगेश गाडी चालवत होता आणि आमचे फोटो मी त्याला दाखवत होतो. परत संध्याकाळी सहाच्या आसपास अगदी मरगळलेल्या अवस्थेत आम्ही संतोष हॉल जवळ गाडीतून उतरलो. सगळ्यांचा निरोप घेऊन घरी परतलो. खूप थकवा जाणवत होता. म्हणून लवकर झोपी गेलो.
दुसऱ्यादिवशी म्हणजे सोमवारी मला आतून जाणवलं की मी अजूनही घरी परतलोच नाही. अजून मन तिथेच त्या होडीत आणि त्या संथ आणि स्वप्नाळू पाण्याच्या तरंगाबरोबर हेंदकाळे घेत बसलंय. ऑफिसमध्ये शांतपणे काम करत होतो. आवाजातील धारदारपणा कुठेतरी हरवला होता. फारसं बोलत नव्हतो. बोललो तरी खूप हळुवारपणे बोलत होतो. मी ..... मी मला खरंच हरवून गेलो.


Wednesday, February 3, 2016

वीर डॅम वरील फ्लेमिंगो

नवीन वर्षांचा आणि पाबे घाटातील सुर्यास्ताचा ब्लॉग तर लिहिला पण वीर डॅम च्या व्हिजिट बद्दल लिहायचंच राहून गेलं.
डिसेंबरच्या मधेच कधीतरी आशूला कुणाकडून तरी खबर मिळाली की त्यानं फेसबुकावर बघितलं की वीर डॅमवर फ्लेमिंगो आलेत. ज्या फ्लेमिंगोसाठी आम्ही १२० किमी भिगवणला गेलो होतो त्यातलेच काही अगदी ६० किमी वरच्या वीर डॅमवर आलेत. भिगवनचा अविस्मरणीय अनुभव डोळ्यासमोरून तरळून गेला. आमचं लगेचच ठरलं, रविवारी (२०-१२-२०१५) वीर डॅम वर. मी, आशू, विरेश आणि सत्या. यावेळी योगेशकडे पाहुणेमंडळी आलेली त्यामुळे तो येणार नव्हता. शनिवारी (१९-१२-२०१५) आशुबरोबर पाबे घाटातील सुर्योदयाचे फोटोशूटिंग झालं होतं. रात्री गप्पा मारतामारता म्हणजे आमच्या चौघांच्याच गप्पा सुरु होत्या. बाकीचे इंटेरेस्टेड नव्हते. कदाचित त्यांना पटलं नसावं. जायचंच असं ठरलं. मी आणि वीरू जर जाणार नसतो तर आशू आणि सत्या पाबे घाटात ग्रीन फुटेड पिजन म्हणजे पिवळ्या पायांचे हिरव्या कबुतरांच्या मागावर जाणार होते. सकाळी सहाला सिंहगड रोडवरील हायवे पुलाखाली भेटायचं ठरलं.
सकाळी घरातून निघताना मला फोन करा म्हणून मी सत्याला सांगितलेलं पण तो विसरला. आशूने चांदणी चौकात आल्यावर मला व विरुला मेसेज केले. आणि मी घरातून बाहेर पडेपर्यंत ते ठरलेल्या ठिकाणी पोचले पण. सकाळ गारठून गेलेली. थंडी वाढतच चाललेली. तसं अजून गारठा आहे म्हणू शकत नव्हतो पण हुडहुडी भरलीच. गाडी चालवता चालवता अंगात गरमी वाढावी म्हणून वेगवेगळे गाडीवरचे व्यायामाचे प्रकार सुरु केले. आणि थंडीमुळे नाचतच पोचलो. योग्य ठिकाणी गाडी पार्क करून आधी पूर्वेकडील गुलालाची उधळण करत असलेल्या आकाशाचे मोबाईलवरच फोटो काढले आणि आम्ही वीर कडे कूच केली. तरी सात वाजायला आले होते.
गाडीत आधी सत्याच्या नवीन कारच्या पार्टीची चर्चा. मग आशूने सांगितले की फ्लेमिंगो बघायला मिळतीलच याची ग्यारंटी कमीच. सगळेच भडकले. थोडा उद्धार झाला. पण आता माघार नाही. भूक लागलेली. त्यात आम्ही अशा ठिकाणी जाणार होतो की काहीही खायला प्यायला मिळणार नव्हतेच. पुणे - कोल्हापूर हायवे वर एके ठिकाणी चांगले पोहे आणि मिसळ मिळतात ते खाऊन पुन्हा मार्ग पकडला. दोन वेगवेगळ्या रस्त्याने वीर डॅम कडे जाता येतं. एक वीर गावातून जातो तर दुसरा वीर डॅमच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. आम्ही गावातून न जाता दुसऱ्या बाजूला गेलो. आधीच कुणीतरी पक्षांच्या मागून गाडी नेत फ्लाईन्ग फोटोग्राफी करायचा प्रयत्न करत होतं. आशू भडकलाच. लांबूनच हातवारे करून थोडी बडबड सुरु केली. मग थोड्यावेळाने ती गाडी निघून गेली. आम्ही पाण्याजवळ गाडी नेऊन उभी केली आणि खाली उतरताच कळालं की आम्ही चिखलात आहोत. बुटाला चिखल चिटकून बसला. चालताना बूट थोडा पँटला खाली घासत होता आणि त्यामुळे पॅन्ट चिखलमय झाली. अजून फोटोग्राफीला सुरवात सुद्धा झालेली नव्हती. कॅमेराची बॅग पाठीवर लटकवल्या. आणि लगेच सत्याने डोक्याला हात लावला. तो कॅमेरातील कार्ड घरी विसरून आलेला होता. माझ्याकडे एक जी बी चं अजून एक कार्ड होतं ते त्याला दिलं पण फारसे फोटो काढणं शक्य नव्हतं. म्हणून वीरूने त्याचं कार्ड शेयर करायचं ठरवलं. लांबून आम्हाला फ्लेमिंगोची तीन पिल्लं दिसली.

आम्ही जवळ जायचा प्रयत्न केल्यावर लांबवर उडून गेले. फोटो काढले पण म्हणावे तसे चांगले काढू शकलो नव्हतो.


तिथेच काही रुडी शेल डक नावाच्या पिवळ्या तपकिरी रंगाच्या बदकाचा थवा उन्हं खात बसलेला.


सत्या आणि आशू त्या तीन फ्लेमिंगोच्या पिलांच्या मागे गेले. मी आणि वीरू या बदकांच्या मागे लागलो. उभ्या उभ्या चालत त्यांच्या दिशेने जायला लागलो पण ते सगळे बिथरून गेले होते. तो थवा तिथून उडून गेला.

मग लक्षात आलं की आम्ही उभ्याने चालत न जाता वाकून हळूहळू पुढे जायला हवं होतं. तिथेच थोडावेळ थांबल्यावर तो थवा पुन्हा आला आणि थोडा लांबवर विसावला. मग मी खालीच बसलो. वीरूला पण खाली बसायला खुणेनेच सांगितलं. खाली वाकून थोडं चालणं आणि परत बसणं, असं करत करत हळूहळू पुढे जात होतो. पण तरी देखील ते लांबलांब जातच होते. मी वळून बघितलं तर वीरूने चक्क लाल रंगाचा टी शर्ट घातलेला. त्यात त्याला वाकून चालणं जमत नव्हतं आणि फार वेळ खाली बसून सुद्धा पायाला त्रास होत होता. आता रांगत रांगत जाणं भाग होतं. आम्ही तसा प्रयत्नही केला. आणि बऱ्यापैकी जवळ जाण्यात यशस्वी झालो. काळ्या चोचीचा, पांढऱ्या डोक्याचा, सोनेरी तपकिरी रंगाचा, त्यातून काही डोकावणारी चमकदार हिरवी पीसं आणि काळ्या शेपटीचा असा हा सुंदर आणि मोहक पक्षी.


याला मराठीत ब्राम्हीणी बदक म्हणतात. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून इथे भारतात किंवा दक्षिणी आशिया खंडात दक्षिणी युरोप किंवा मध्य आशिया खंडातून येतो. इतकं सगळं मी इतरत्र वाचून त्यातील काही भागच लिहितोय. उठल्यावर गुढग्यावर नजर गेली. दोन्हीबाजूच्या गुढग्यावर चिखलाचे दोन मोठे ठसे उमटलेले. या गोष्टींची सवय हळूहळू पडायला लागलीये.
मग आमचा मोर्चा पुन्हा फ्लेमिंगोकडे वळला. वीरू, सत्या जिकडे जाऊन बसला होता तिकडे गेला. मी दुसऱ्या बाजूने पुढे जात होतो. पण ते पुन्हा उडून लांब गेले. आज त्यांचा फोटो काढायला मिळेल असं वाटत नव्हतं. कोणत्या दिशेने गेलेत त्यावर मी लक्ष ठेऊन होतो. गाडी जिकडे लावलेली तिथून थोडं पुढे गेल्याचे दिसले. मग सगळेच उठलो आणि गाडीकडे परतलो. आधी पाणी पिणं मग थोडी मस्ती. उड्या मारतानाचे काढलेले फोटो.

इतकं होताना आजूबाजूला लक्ष गेलं. धरणाच्या पाण्यात गाड्या धुण्यावर बंदी असताना काही गावकरी मंडळींचं गाड्या धुणं चालूच होतं जसं की त्यांच्या ते गावी नव्हतंच. आशूचा तळतळाट होत होता. त्याला काय करावं कळत नव्हतं. आम्हाला वादाचे प्रसंग अजिबात नको होते. त्यामुळे वेळ जातोच पण साध्य काहीही होतं नाही. त्याने तरीही त्यांचे मोबाईलवर फोटो काढलेच. त्याचं तो काय करणार ते मात्र कळालं नाही. काही अंतरावर दोन तीन धोब्याचं मन लावून काम सुरु होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तीनही फ्लेमिंगोची पिल्लाचं त्यांच्या अगदी जवळच काठावर पाण्यात उभे राहून खाणं चाललेलं.


मी सत्याला ते दाखवलं. त्याची प्रतिक्रिया तर अजून बुचकाळ्यात टाकणारी होती. तो म्हणाला की त्यांना माहिती आहे की त्या धोब्यांपासून त्यांना काहीही धोका नाही. आणि ते धोबी त्यांच्यामागे लागणारही नाहीत. आमच्यापासून मात्र ती पिल्लं दूर पळून जात होती. आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला पण तिथूनही ते उडून गेले.


जवळून फोटो घ्यायचा काहीतरी मार्ग काढणं आवश्यक होतं. ते ज्या दिशेने गेले तिकडे आम्ही गाडीतूनच गेलो. गाडी रस्त्यावर उभी करून त्या पिल्लांच्या दिशेने हळूहळू वाकत चालत जाऊ लागलो. वीरूला जॅकेट घालण्यास सांगितले पण उन्हामुळे प्रचंड गरमही होत होतं म्हणून त्यानं नाकारलं. तो आणि सत्या माझ्या उजव्या बाजूने जात होते. मी मधून आणि आशू डाव्याबाजूने जायला लागला. आम्ही वाकत चालत होतो. रांगत जाणं शक्यच नव्हतं. एकतर गळ्यात कॅमेरा. तो एका हातात धरून पुढे सरकत जाणं जमत नव्हतं. त्यात छोटे दगड गुढग्याला टोचत होते. खुज्या हिरवळीतून मात्र रांगतच जात होतो. खरंतर कुणीतरी असा आमचा फोटो काढायला हवा होता. जसजसं पुढे जात होतो तशी ती पिल्लं हळूहळू पुढे जात होती पण उडून जाणार नव्हती. मी एकदोन मीटर गेल्यावर थांबत होतो. आशू डावीकडे फार लांब गेला व तिकडून फ्लेमिंगोच्या दिशेने रांगतच येत होता. मी एका कोरडया जागी बसून राहिलो. आता आशू जसा इकडे येत होता तसे ती पिल्लं माझ्याकडे सरकायला लागली. माझं फोटो काढणं सुरूच होतं.



आशूला खुणेने अजून जवळ यायला सांगत होतो आणि त्याच वेळी सत्या मागून आम्हाला परत बोलवत होता. आशू आणि मी आमच्याजागी बसून राहिलो.
फ्लेमिंगो स्वतःभोवती फिरत नाच करत त्याचं खाणं करत असतात असं आम्हाला मागे भिगवणला गाईडने सांगितलेलं आठवलं आणि आज त्यांना तसं करताना प्रत्यक्षात पाहत होतो. स्वतः भोवती गोल फिरतात आणि काठावरील पाण्यातील गाळ नाचत हलकासा ढवळतात की त्या गाळात लपलेले किडे आणि छोटे मासे त्यातून बाहेर पडल्यावर अलगद टिपता यावेत. हा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम. आशूने त्याचा केलेला व्हिडीओ आम्हाला परतताना दाखवली. मी तर आवाकच झालो. ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. अशा बऱ्याच गोष्टींचं आकलन व्हायला खरंच निरीक्षण करण्याची आवश्यकता असते.

(तो व्हिडीओ आशूने यु ट्यूब वर अपलोड केलाय. त्याची ही लिंक. जरूर बघा.
https://youtu.be/8ZMjorqPKmk )

सत्या सारखा बोलवतोय म्हणून आम्ही तिथून हुळुवार वाकत उठून परत चाललो, जेणेकरून फ्लेमिंगो जसे स्वतः मधे मग्न होते तसेच रहावेत हा आमचा प्रामाणिक उद्देश. सत्या म्हणाला," अरे हम ये तीन के ही पीछे पडे है। डॅम के दुसरे साईड में बहोत सारे है। वहीं चलेंगे।" असं म्हणून त्याने आम्हाला एक फोटो दाखवला. दुसऱ्या बाजूला फ्लेमिंगोंचा मोठ्ठा ग्रुप होता. आणि त्यांच्या जवळच एक फोटोग्राफर फोटो काढत होता. लगेच आम्ही गाडीतून तिकडे निघालो. एव्हाना सूर्य बराच वर आलेला. खूप गरम होत होतं. आमच्याकडंच पाणी कधीच संपून गेलं होतं. रस्त्यावरील एका घरासमोर थांबून त्यांच्याकडून दोन बाटल्या भरून घेतल्या. कारण या भागात हॉटेल नावाचा प्रकार कुठेही दिसत नव्हता. खेडेगाव लहान असल्याने हॉटेल असण्याची चिन्ह नव्हती. ते गाव मागे पडलं. दोन्ही बाजूला लांबपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती त्या गावांची नैसर्गिक समृद्धी दाखवत डोलत उभी होती. अजिबात राखरखीतपणा वाटत नव्हता. डोळे थोडे शांत झाले. तो रस्ता सोडून आम्ही वीर गावाकडे वळालो. कोपऱ्यावरच्या छोटेखानी हॉटेलवर खाण्यापिण्याची सोय तरी होते का बघायला म्हणून आम्ही उतरलो. जे असेल ते खायचं ठरलं. भेळ मग भजी नंतर गरमागरम वडापाव आणि माझ्याकडचा चिवडा. प्रचंड भूक लागलेली. गप्पा मारता मारता किती खाल्लं कोण जाणे. थोडी तरतरी आली. चहाचे गरमागरम पाणी ढोसलं आणि निघालो. पुढे धरणातून कॅनॉल मधे पाणी जिथून सोडतात त्याठिकाणी आशू म्हणाला की किंगफिशर बघायला मिळतील. म्हणे त्याने तिथे पाहिलेले होते. म्हणून गाडी थोड्या सावलीत उभी करून आम्ही किंगफिशर चा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण काहीही दिसलं नाही. गाडीकडे परतताना, भला मोठा सुकलेला काटा सत्याच्या चपलेच्या तळातून आरपार घुसला. काटा काढून बघितलं तर पाय रक्ताने माखून गेला. मग नुकत्याच भरलेल्या एका बाटलीतील पाण्याने पाय धुवायला लावला व गाडीत बसलो. त्याचा पाय बहुदा खूप ठणकत होता. गाडी हळूहळू चालवत त्याने कशीबशी पुढे एका छोट्या हॉटेलपर्यंत नेली. आधी बर्फ़ाचा शेक मग हळद लावून भरपूर पाणी प्यायला लावलं. बहुदा ठणक थोडी कमी झाली असावी.
धरणाच्या कडेने जाताजाता सगळ्यांचंच लक्ष बाहेर पक्षांचा शोध घेत होतं. ऊन वाढलं की पक्षी गायब होतात. आम्हाला साधा कावळा सुद्धा दिसला नाही. धरणाची भिंत संपल्यावर एका ठिकाणी शेतातून एक पायवाट पाण्याकडे जाताना दिसली. गाडी झाडाखाली उभी करून पायवाटेवरची धूळ उडवत आम्ही चालत निघालो. आधी उसाची शेती ओलांडून पुढच्या खूप आधी कापणी झालेल्या शेतातून जाताना अचानक जमिनीवरून काही तपकिरी रंगाचे पक्षी कलकलाट करत उडून गेले. त्याचा रंग अगदी तांबड्या मातीसारखा असल्याने ते सहजासहजी नजरेस पडत नाहीत. पण अचानक कलकलाट करत उडून गेल्यामुळे छातीत धडकी भरते. काही कळायच्या आत खूप लांब जाऊन पोचतात. असा माझा हा दुसरा प्रसंग. मागे मी आणि सत्या हिंजेवाडी मागील छोट्या बंधाऱ्याकडे जाताना असाच प्रसंग अनुभवला होता. हे पक्षी झाडावर रहात नाहीत तर जमिनीवरच त्यांचं आयुष्य जातं. एकट्याने कधीच रहात नाहीत. घरटं बांधण्याच्या भानगडीत न पडता खुज्या झाडाझुडपात राहतात. त्यांचा रंग बुरुम मातीच्या रंगाशी इतका साम्य असतो की अगदी दोन चार फुटावर असले तरी सहजासहजी नजरेस पडत नाही.
मी आणि सत्या तेथील छोट्या माळरानावर हळूहळू चालत त्या पक्षांचा शोध घेत होतो. ज्याठिकाणी ते सगळे परत आले होते तिथे पोचलो. यावेळी कॅमेरा सज्ज होता. आधी वाटलं की इथून ते पुन्हा निघून गेले असतील म्हणून आम्ही परतणार तेवढ्यात तो कळप पुन्हा कलकलाट करत उडून खूप लांब गेला.


त्यांचा फोटो काढण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केला. पण पुन्हा सेटिंग्ज नीट नसल्याने खूप खराब फोटो आले. बहुदा सत्याला चांगले फोटो काढता आले असावेत. आम्ही मागे राहिलो होतो. आशू आणि वीरू पुढे पाण्यापर्यंत जाऊन परत येत होते. फ्लेमिंगो काही दिसले नाहीत. कदाचित आम्ही चुकीच्या बाजूला आलो होतो. धरणाला येऊन मिळणाऱ्या नदीच्या दुसऱ्या तीरावर बहुदा फ्लेमिंगो असावेत. नदी पार करायला जागा नव्हती. दुपारच्या उन्हात हिंडून आमची एनर्जी संपली होती. एखादे उंच झाड तिथे असतं तर कदाचित आम्ही त्याच्या सावलीत अक्षरशः ताणून दिली असती. अगदी कसंबसं गाडीकडे परतलो आणि परतीचा मार्ग पकडला. सगळेच ढेपाळले होते. इतके की कॅमेरा बॅगेतून काढून फोटो बघावेत असं वाटलं नाही. आशूने फ्लेमिंगोचा विडिओ बघून सगळेच खुश झाले. घरी परतलो तेंव्हा घड्याळ संध्याकाळची साडेपाचची वेळ दाखवत होतं.

आणखी काही फोटो …










Saturday, January 16, 2016

आता पाबे घाटातील सूर्यास्त

आज थोडा उशीराच उठलो. काल तर कहरच झाला. काल मी चक्क कधी नाही तो दुपारी तीन वाजता उठलो. अगदी कुठेही बाहेर जायचा कंटाळा आला होता. पण पोटपूजा करणं भाग होतं. आज सकाळी लवकर उठायचं ठरवलं पण उशीरा झोपलो आणि उशिरा उठलो. तरी सगळं आवरायला साडे अकरा वाजले. मग काय खाणं पिणं! झोपलो तर नक्कीच नाही. आधी सगळं घर साफ केलं. मग कॅमेराचा सेन्सर साफ करत बसलो. दोन आठवडे कुठेच बाहेर फिरायला गेलो नव्हतो. मागचा शनिवार रविवारी तर जाम सर्दीमुळे घरात झोपून काढला होता. आणि कालचा शनिवार पण झोपून गेला होताच. घर आणि ऑफिस करून जाम कंटाळा पण आला होता. पण बाहेर जायची इच्छा होत नव्हती. दुपारी मस्त भटकंती चा एक ब्लॉग वाचला आणि स्वतः ला म्हणालो अरे हट, असा आळश्यावाणी वेळ घालवलास तर कसं होणार? झालं! डोळ्यावर येऊ पाहणारी झापड एकदम गायब. उठलो आणि पटकन आवरून घरातून बाहेर पडायचं ठरवलं! पण जाणार कुठे? विचार करता करता कसा तास भर गेला कळालंच नाही. चारला एक गोष्ट पक्की झालीच. पाबे घाटात सूर्यास्त टिपायचा!
कॅमेरा बॅगेत टाकला. पाण्याची बाटली बॅगेत टाकली आणि तडक निघालो. कालनिर्णयच्या कॅलेंडर मध्ये सूर्यास्ताची वेळ बघितली. सहा वाजून सोळा मिनिटे. वेळ भरपूर होता पण अर्धा तास आधी पोचणं आवश्यक होतं. नेहमीच्या ठिकाणी चहा घेऊन बाहेर पडता पडता चार वीस झाले. मग थोड्या वेगाने जायला लागलो पण कसचं काय? आधी लहान रस्त्यावर गाड्या हळुवार चाललेल्या. सिंहगडाची ट्रिप संपवून बऱ्याच गाड्या परतीच्या मार्गाला लागलेल्या म्हणून सिंहगडाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय कमी झाला होता. मग पेट्रोल भरणं आवश्यक होतं. शुक्रवारी न भरल्याचा परिणाम. सिंहगड-पानशेत रस्ता सोडून जसा पाबे रस्त्याला लागलो तसा वेग अजून कमीच झाला. एक तर वळणावळणाचा घाट रस्ता. त्यात उलट दिशेने येणाऱ्या आणि उताराला लागलेल्या वेगवान गाड्यांना चुकवतच चाललेलो. रस्ता किती खराब आहे याची जाणीव आज झाली. मागच्या दोन्ही ट्रिपच्या वेळी माझं रोड पेक्षा आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात गेलेला. पण आज मला पाबे घाट चढून वर जायचं होतं. आजचा सूर्यास्त तेथूनच टिपायचा होता. आणि म्हणून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देण्यापेक्षा लवकर पोचणं गरजेचं होतं. गाडीचा वेग वाढवला की गाडी टनाटना उड्या मारायची. फारतर फार मी २७kmph या वेगाने जात होतो तरी असं वाटत होतं की यार आपण खूप वेगात आहोत. जंगल संपलं. ओळखीचं गाव मागे पडलं. एक दोन वेगवेगळे पक्षी समोरून गेले. संध्याकाळ होत आली होती तशी त्यांची सुद्धा धावपळ सुरु झालेली. पण मला आज त्यांचे फोटो काढायला किंवा लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. पाबे घाटात पोचता पोचता सूर्य त्या डोंगरापलीकडे लपाछपी खेळायला लागला. वाटलं, सूर्यास्त बघायला तरी मिळतो की नाही! घाट रस्ता जरा चांगला आहे पण वळणं अवघड आहेत. गाडीचा वेग कमीच ठेवावा लागतो. समोरून येणाऱ्या गाड्यांना आपली गाडी दिसावी म्हणून लाईट सुरु करून ठेवले. घाट चढताना विचार आला की परतताना कदाचित आपण एकटेच असू. थोडी धास्ती वाटली. पण इतक्या लांबवर येऊन परत जाणं अजिबात पटलं नाही. जे व्हायच ते होवो. पण इथलाच सूर्यास्त बघायचाच. पोचलो एकदाचा त्या पाबे घाट माथ्यावर.
ज्या छोट्या टपरीवर मागच्यावेळी झुणका भाकर खाल्ली होती तिथेच गाडी उभी केली आणि चहाची ऑर्डर दिली. ते दादा चहा तयार करून देतात. चहा कधीही तयार ठेवत नाहीत. चहाचे आधण उकळेपर्यंत थोडा पुढे उताराकडे गेलो आणि सूर्यास्त टिपण्याची जागा शोधून ठेवली. चहाचे भुरके मारता मारता समोर पाबे घाट खिंडीकडे लक्ष गेले.


 राजगड आणि त्यामागील भगवा रंग परिधान करू पाहणारं आकाश अतिशय सुंदर दिसत होतं. पहिली फ्रेम तरी फिक्स केली. चहा संपल्यासंपल्या आधी कॅमेरा काढून वेगवेगळ्या अँगलने चार पाच फोटो काढले. छोट्या स्क्रीनवर तर हवे तसे फोटो मिळाल्यासारखे वाटले. पाबेच्या उतार घाट रस्त्यावर चालत गेलो आणि पुढच्याच वळणावर असलेल्या थोड्या मोकळ्या जागेवर उभा राहिलो. सुर्यास्ताचा अंदाज घेतला. अजून अर्धातास तरी बाकी होता. म्हणजे मी ठरलेल्या वेळेत पोचलो होतो. एक सुस्कारा टाकला.


आधी तोरणा गडाच्या बाजूचे फोटो काढले. तसे बरेच काढले. प्रकाश अजून बऱ्यापैकी होता पण धुक्यामुळे त्यात तीव्रता म्हणावी तितकी नव्हती. फोटो शार्प येणार नाहीत याची खात्री होती तरी फोटो काढले. लॅपटॉपवरच कळू शकणार होते. नंतर सूर्य मावळतीच्या बाजूचे तसेच राजगडाचे फोटो काढत होतो. योग्य फ्रेम शोधत होतो. घरातून बाहेर पडतानाच कॅमेराला 18-140mm ची लेन्स लावूनच बाहेर पडलो होतो. उद्दिष्ठ पक्कं होतं. त्यामुळे लेन्स बदलायची गरज नव्हती. 18mm ( फोकल लेन्थ अशी मोजतात ) मध्ये जितका परिसर दिसू शकत होता तितका पुरेसा होताच. पण 140mm ( म्हणजे पूर्ण झूम करून) जेवढं दिसत होतं ती सुद्धा वेगळी फ्रेम दिसत होती.
येणारेजाणारे माझ्याकडे बघत होते. काही ओळख असल्यासारखे हसून मान डोलावून गेले. तर काही बघून न बघितल्यासारखं करून आपल्याच धुंदीत निघून गेले. मी घाट माथ्यावर पोचलो तेंव्हा एक कार उभी होती त्यांनी मला घाट सुरु होताना ओव्हर टेक करून पुढे गेले होते. त्यातील तीन चार जण घाट माथ्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात मग्न होते. आणि त्यातील एक जण त्या परिसराची माहिती देत होता. आता ती कार पाबेकडे गेली. जाताना त्या गाडीतील काका माझ्याकडे हसून मान डोलावून म्हणाले," छान, उत्तम". मी त्यांच्याकडे बघून छानसा हसलो आणि तितकाच आनंदी झालो. तोरणा किंवा राजगडाची ट्रिप करून काही तरुण मंडळी पुण्याकडे जाता जाता मी जिथे थांबलो होतो तिथे थोडावेळ थांबून लगेच निघून जात होते. माझं फोटो काढणं सुरूच होतं.
जसजसा सूर्य खाली जात होता तसतसा आकाशाचा रंग सुद्धा बदलत चालला होता. खालच्या दरीत अंधार पडायला सुरु झालेला. काही ठिकाणी दिवेलागणी झालेली.


सूर्याची प्रखरता बरीच कमी झालेली. त्या सोनेरी गोळ्याचा आकार व्यवस्थित दिसू लागलेला. त्या लांबवरच्या डोंगराच्या माथ्यावरील झाडांच्या रांगेत जाऊन बसायची तयारी त्याने केलेली हाती. संपूर्ण भोवतालचा परिसर सोनेरी रंगात झळकत होता आणि जसा सूर्य खाली जात होता तशी ती झळाळी हळूहळू कमी होत चाललेली. त्या डोंगरमाथ्यावर जसा सूर्य जाऊन विसावला तसा मी दोन ठरवलेल्या फ्रेम्स टिपल्या. एक पूर्ण झूम करून आणि दुसरी थोडी झूम करून पण त्यात राजगड सुद्धा दिसेल अशी एक.


 न थांबता फोटो काढत होतो. कॅमेराचे सेटिंग पटापट बदलत होतो. काही फोटो चांगला प्रकाश असल्यासारखे तर काहीत आजूबाजूचा परिसर काळा आणि वरील आकाश भगवट तपकिरी रंगात आणि त्यात तो सोनेरी रंगाचा सूर्य. काही झूम न केलेल्या फोटोत अगदी वरचे निळे आकाश सुद्धा दिसत होते. सूर्य पूर्णपणे त्या डोंगराआड जाई पर्यंत माझं फोटो काढणं सुरूच होतं. समाधानी होतो. एकही फोटो कॅमेराच्या स्क्रीनवर बघितला नाही. जे काही असेल ते घरी गेल्यावरच बघायचं ठरवलं. काही चुकलं असेल तर आताच्या समाधानाची चव कमी करायची नव्हती. कॅमेरा तसाच गळ्यात लटकवून गाडीकडे परतलो.
तिथे काही चारपाच मित्रमित्र अशीच रविवारची संध्याकाळ मजेत घालवायला आलेले. कदाचित त्या चहावाल्या दादांकडे जेवणाची ऑर्डर देऊन बिअरचे टीन घेऊन उभे होते. आणि लक्षात आलं की, या ठिकाणी अशीच काही लोकं मजा करायला येतात. यायला काहीच हरकत नाही हो. पण त्यांनी त्यांचं पिणं झाल्यावर ते टीन घरी तर नक्कीच घेऊन गेले नसतील. आणि तिथेच टाकून परिसर आणखी विद्रुप करणार. थोडा विषन्न झालो. मी काही करू शकणार नव्हतोच. किंबुहना, मी त्यांना विनंती करू शकलो असतोही. पण वादाचा प्रसंग ओढवला असता तर काय? मी लक्ष न देता परत आलो. शांतपणे अजून एक चहा घेतला. त्या चहावाल्या दादांच्याबरोबर थोड्या गप्पा झाल्या. तेंव्हा एक कळालं की त्यांची कमाई ही त्या टपरीवरच आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांमुळे थोडी शिल्लक पडेल इतकी कमाई होते. अन्य दिवशी मात्र त्यांची मजुरी तितकी सुटते. एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. शक्यच नाही. बहुदा शेती नसावी. किंवा असली तरी यावर्षी पाऊस फारसा नव्हताच. तसेच यापरिसराला पाणी पुरवठा होईल असं काही धरण किंवा बंधाराही नाही. अजून एक गोष्टीची माहिती झाली की या भागातील गावांकडे एस टी महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. एकही एस टी येत नाही. मग पुणे महानगर परिवहन मंडळाची बस तर शक्यच नाही. गावातील लोकांना स्वतःच्या गाडीची व्यवस्था करावी लागलीये किंवा कधीतरी येणाऱ्या रिक्षांवर अवलंबून राहावं लागतंय. दादांच्या ओळखीेच्या बऱ्याच लोकांचं येणं जाणं सुरु होतं म्हणून फारसं विचारताही आलं नाही.
परतताना घाटात गाडीचा वेग फारच कमी ठेवला. जवळपास अंधारच झाला होता. घाट उतरून खाली येई पर्यंत काळोख झालेला. किरकिर किडयांनी आजूबाजूचा परिसर दणाणून सोडलेला. गावागावात दिवे लागणी झालेली. दुरवर पुसटशी चाहूल दाखवणारा सिंहगड झोपायच्या तयारीत असल्यासारखा दिसला. कालच अमावास्या होती मग आज चंद्रप्रकाश असणं शक्य नव्हतं. त्यात गाडीच्या दोन हेडलाईट पैकी एक बंद पडला. अंधारात रस्त्याचा अंदाज घेतच चाललेलो. तशा थोड्या गाड्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे मघाशी वाटलेली धास्ती आता वाटत नव्हती.
थंडी वाढत चाललेली. घरी पोचेपर्यंत साडेआठ नक्की वाजणार होते. घरी जाऊन जेवणासाठी परत बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती. मग वाटेतील त्या समर्थ हॉटेल मधून जेवण पार्सल करून घेतलं. ताज्या भाकऱ्या अंडा रस्सा आणि भात. हॉटेल मालक म्हणाले की इथेच गरम गरम खाऊन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण जेवल्यावर मला पटकन आडवं व्हायचं होतं. आणि घरी जाऊन शांतपणे जेवणंच योग्य वाटलं. घरी आलो. खरंच साडेआठ वाजले. आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले आणि सर्व फोटोंवर एक नजर फिरवली. कष्टाचं फळ मिळालेलं दिसलं.


Sunday, January 3, 2016

वर्ष समाप्ती (२०१५) आणि वर्षारंभ (२०१६)

आपण नुकतेच २०१६ मधे प्रवेश केलाय. नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कुणी व्हाट्सअँप वर स्वतःचे मेसेज तयार करतंय तर कुणी आपल्याकडे आलेल्या आणि त्यातल्यात्यात चांगले असलेले मेसेज फॉरवर्ड करतायत. वर्षभरात चालणाऱ्या सणसमारंभात अजून एकाची भर कधी पडली हे आपल्यालाच आठवत नाही. आणि आपण त्या सोहळ्यात सगळ्यांबरोबर ओढले जाऊन त्या सोहाळामय केंव्हा होतो तेही लक्षात येत नाही. बस शाळेत वरील वर्गात प्रवेश करताना जसं मोहरून जात होतो तसं नेमकं काहीतरी होत असतं. तसं बघायला गेलं तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीत काहीच फरक नसतो पण तरी आपण तो सोहळा उत्साहात पार पाडतो.
नवीन वर्षांचे संकल्प होतात. काही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे संकल्प करतात तर काही जुनं विसरून नवीन स्वप्ने बघायला लागतात. संकल्प करताना त्यावर शाळेतील मास्तर किंवा बाईंच्या करड्या नजरेची धार नसते. आणि इथेच सगळं गणित बिघडतं. कुणी छोटे छोटे संकल्प करतं तर कुणी अगदी आयुष्य बदलून टाकण्याचा निश्चय करतात. खरंतर वर्ष समाप्तीला यावर विचार करण्याची गरज ज्याने खरंच मनापासून निग्रह केला त्यालाच वाटते. अन्यथा बाकीचे करतात म्हणून संकल्प केला पाहिजे, अशा पद्धतीनेच करतात.
मी सुद्धा दुसऱ्यावर्गात मोडणारा प्राणी. खुपवेळा प्रयत्न करून सुद्धा एखादं दुसरा आठवडा त्या मागे लागलेलो असा आरंभशूर. तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच पूर्ण विसरून सुद्धा गेलेलो. अगदी जिम ला महिन्याचे पैसे भरून दोन दिवसच गेलो आणि एकदा पैसे भरून गेलोच नाही. सायकल घेतली. मोजून दोन दिवस हौसेने चालवली. तिसऱ्या दिवशी मांड्या दुखण्याचं कारण घेऊन बंद. ती सायकल आता धूळ खात पडलीय. डायऱ्या मधील जानेवारीच्या ३१ पर्यंतची पाने सुद्धा कधी भरली नाहीत. रोज लिहिणार तरी काय? आजूबाजूला नवीन काही घडतंय यावर लक्ष ठेवावं लागतं म्हणजे तशी दृष्टी ठेवावी लागते आणि कान सतत उघडे ठेवावे लागतात याची कल्पनाच कुणी दिली नव्हती किंवा असं काहीतरी करावं म्हणजे तरी लिहिण्यासारखं सापडेल याचं सुद्धा भान आलं नाही. मग रोज रोज लिहिणार तरी काय? कपाळ?
आता तर वर्षभरात केंव्हाही संकल्प होतात आणि ते पूर्णत्वात जातातही! कसंही करून पूर्ण करायचंच याच्यामागे मी लागतो.
माझा चौथा ब्लॉग वाचल्यानंतर, आमच्या ऑफिसचे एच आर, केदार सरांनी सहज बोलता बोलता म्हणाले की नवीन वर्षांचा सूर्योदय बघायचाय तोही तुमच्या फोटोग्राफ मधे. पहिल्यांदाच अशी विचारणा माझ्यापर्यंत पोचवली होती. म्हटलं वा! नक्की पूर्ण करू. यातून माझ्या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पहिलं म्हणजे, केदार सरांची अगदी लहानशी गोष्ट पूर्ण केल्याचा आनंद आणि दुसरं म्हणजे वर्षांची सुरुवातही छान होणार. त्यांना रिक्वेस्ट केली की ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला मला हाफ डे लिव्ह द्या. पण त्यांनी ती रिक्वेस्ट नम्रपणे नाकारली. म्हणाले की ३१ डिसेंबर चा मावळणारा सूर्य बघण्यापेक्षा एक जानेवारीचा सूर्योदय बघण्यात आनंद मिळेल. म्हटलं ते हि ठीक आहे. पण माझ्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसली की काहीही झालं तरी ३१ चा मावळणारा आणि १ ला उगवणारा सूर्याचा फोटो नक्की काढायचा. कसा? माहीत नाही.
३० तारखेला माझी साईट व्हिजिट होती. त्या ऑफिसचं काम नवव्या मजल्यावर आहे. पहिले दोन मजले पार्किंग साठी राखीव आहेत म्हणजे ते ऑफिस अकराव्या मजल्यावर आहे. संध्याकाळी तिकडे जाताना, पश्चिमेकडे थोडे जमा झालेले ढग आणि सूर्य मावळायला आलेला दिसला. त्या ऑफिस साईटच्या बाल्कनीतून सुंदर फ्रेम मिळेल याची खात्री झाली. मग काय! अगदी गाडीवरून शहराच्या रस्त्यावर हळुवार चालवणारा मी, सुसाट सुटलो. आणि पोचलो सुद्धा. कितीही घाईत असलो तरी सिग्नल मात्र तोडत नाही. किंवा अगदी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करत नाही. खरंतर कुणाच्यातरी पुढे जाऊन उभे राहण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करण्याने काहीही फरक पडत नाही किंवा आपण काही फार वेगळं करत नाही. अशा लोकांना सुशिक्षित तर मी मानतच नाही. गाडी सुसाट नेणे सुद्धा काही योग्य नसतेच पण मोकळ्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वेग ठेवणे काही चुकीचं असेल असं मला तरी वाटत नाही. एरवी मी बाकीच्यांना रस्त्यावर पुढे जाऊन देतो, पण त्या दिवशी मी बाकीच्यांना मागे टाकून जात होतो.
पोचलो एकदाचं. लगेच बाल्कनीत धाव घेतली पण एक दोन मिनिट उशीर झालेलाच. सूर्य मावळला होता पण विचार केलेली सुंदर फ्रेम अजूनही होती. तसं त्या ढगांच्या आडून सूर्य दिसलाच नसता. माझ्यासाठी थांबलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून पाच मिनिटांची वेळ मागून घेतली खरी पण कॅमेरा घरात. मोबाईल वर फोटो काढणे भाग होतं. आधी सर्व परिसर नजरेखालून घातला. फ्रेम सिलेक्ट केली. मी काही नवीन कॅमेराचे ऍप डाउनलोड केलेत. त्यात एच डी आर नावाच्या ऍप मधे फोटो काढले.

 दोन तीनच. तेवढेच पुरेसे होते. मोबाइलला झूम लेन्स नसतात मग कितीही फोटो काढले तरी फारसा फरक येत नाहीत. फार वेळ घालवणंही शक्य नव्हतं. विचार केला, ३१ ला हाफ डे ची सुट्टी मिळणारच नाही तर इथेच येऊन फोटो काढावेत. दोन्ही गोष्टी साध्य होतील.
३१ डिसेंबरला सकाळी उठलो तेंव्हा लक्षात ठेवलं की कॅमेराची बॅग घेऊन जायची आहे. पण गडबडीत विसरलोच. ऑफिसमधे पोचल्यावर लक्षात आलं. एकूण काय, ३१ डिसेंबरचा सूर्यास्त पुन्हा मोबाईल मधेच टिपावा लागणार. थोडा मूड गेलाच होता. त्यात भर म्हणून दुपार पासून शिंकांनी पाठलाग सुरु केला. आठवडयापासून थोडी सर्दीची वार्ता मिळालीच होती. ती आली. सकाळ पासूनचा उत्साह सुर्यास्ताअगोदर कुठेतरी मावळला. संध्याकाळी शिंकांच्या मुळे कुठेही जायच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. सूर्य माझी वाटही बघणार नव्हता. तो मावळायच्या वेळीच मावळला आणि अंधार पडल्यावर मी सात वाजता ऑफिस मधून बाहेर पडलो. सरळ घर गाठलं. लवकर झोपून लवकर उठायचं होतं. किमान वर्षाच्या सुरवातीला तरी फोटोग्राफी करायचीच होती. रात्री झोपलोही लवकर. काहीही औषध घेतलं नाही. कारण त्यामुळे गुंगी येऊन उशिरा उठाण्याचं कारण नको होतं.
पहाटे नाक चोंदल्यामुळे साडेचारालाच जाग आली. कालनिर्णय च्या ऍप मधे सुर्योदयाची वेळ बघितली. सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी सूर्योदय होता. अजून खूप उशीर आहे म्हणून पुन्हा झोपायचा निष्फळ प्रयत्न करत तसाच पडून राहिलो. सकाळी पाच अडतीस चा शनिवार रविवार साठीचा गजर झाला. पाच अडतीसच का? पाच तीस, पाच पस्तीस किंवा पाच चाळीस का नाही? विशाल सर ( विशाल नाईक, आमच्या ऑफिस मधील सिनियर इंटिरियर डिझायनर) यांनी मागील ब्लॉग मध्ये वाचून, विचारलेला प्रश्न मला आठवला. त्याचं कारण तसं काहीच नाही. चार पाच मिनिटं डोळे मिटून पडता यावं आणि बरोब्बर पावणे पाचला उठायचंच म्हणून कदाचित असा गजर लावताना मी विचार केला असू शकेल. मलाच आत्ता आठवत नाही. गजर वाजून थकला आणि अर्ध्या तासाने शांत झाला. मी उठलोच. नाक नको म्हणत होतं पण मी उठलोच. पाणी गरम करून वाफ घेतली. थोडं बरं वाटलं. काल पळून गेलेला उत्साह परत आला. गुढगेस्नान उरकली. वेळ न दवडता कपडे चढवली. थंडी वाजतेय म्हणून जॅकेट घातलं. कदाचित मलाच थंडी वाजत असावी. तसा मी फारसा लांब जाणारच नव्हतो. डी एस के विश्व हे पुण्याच्या पश्चिमेच्या एका टेकडीवर डी एस के नीं वसवलेलं एक छोटं गाव. इथे सन-राईज आणि सन-सेट असे दोन पॉइंट्स आहेत. अशा या रम्य आणि निसर्गमय दुनियेत मी नुकताच राहायला आलोय. या सन-राईज पॉईंट वर मी जाणार होतो. इथून यापूर्वी फोटो काढलेत सुद्धा. पण हिवाळ्यात नाही. शक्य झालं तर मी पुढे भटकायला जाणार होतो म्हणून हेल्मेट गाडी सहित तिथे गेलो. माझ्याआधी कुणी उठून फोटो काढायला एक जानेवारीला येईल असं वाटलं नव्हतं. पण एक तीस पस्तिशीतली स्त्री फोटो शूट करत होती. अजून सुर्योदयाची वेळ झालेली नव्हती. सात बारा होऊन गेलेले पण दोन तीन मिनिटांत सूर्य त्याचं दर्शन देणारच होता. मंद हवा सुटलेली. कानाला गार लागत होतं. नाक ओढणं चालूच. पण समोरच दृश्य ते सर्व विसरायला लावणारं होतं. मी कॅमेरा बॅगेतून काढला आणि शूटिंग सुरु केलं. एक फोटो काढला तेवढ्यात कानावर नाजूक आवाज आला. "सर, मी मघाच पासून प्रयत्न करतेय, ऑटो मोड वर जे कलर्स दिसतात ते मॅन्युअल मोड मधे येत नाहीयेत. तुम्ही ISO किती ठेवता?" त्या बाईंनी विचारलं. मी," एक मिनिट" इतकंच. आणि पुन्हा दोन तीन फोटो काढून सेटिंग योग्य असल्याची खात्री केली व त्यांना त्याच्या कॅमेराबद्दल विचारलं. त्यांच्याकडेही तोच कॅमेरा होता. मग मी त्यांना ISO 100 च ठेवतो पण बाकीचे सेटिंग काय असतात ते त्यांना दाखवले. खरंतर जितक्या सेटिंग्ज त्यांनी पाहिल्या तितक्या कमीच होत्या. अजून बऱ्याच सेटिंग्ज असतात त्या सहज लक्षात येत नाहीत. त्याची माहिती कॅमेराशी खेळत असतानाच समजतात.
 आणि मी फोटो शूट मधे व्यस्त झालो. दोन तीन मिनिटात अजून काही लोकं आली. म्हणून कदाचित त्या बाईंनी पुन्हा मला काही विचारलं नाही. किंवा मला डिस्टर्ब करावासा वाटला नसेल. पण मी इतरांकडे लक्ष न देता शूटिंग सुरूच ठेवलं. डोंगरापल्याडून उगवणारा सूर्य ही तोच होता जो मी सिंहगडासोबत टिपला होता. इथे निराळेपण आजूबाजूच्या परिसरात आणि वातावरणात होता. तिथे विरळ धुकं तर इथे डोंगराखाली दाट धुकं. तिथे सिंहगडाच्या पायथ्याला झाडी आणि छोटं टुमदार गाव आणि इथे डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचलेलं शहरी काँक्रिटचं जंगल.




सिंहगडाची उंची जास्त त्यामुळे जास्त प्रखर झालेला तो सूर्य या ठिकाणी खुज्या डोंगरापलीकडून येताना थोडा मवाळच वाटला. मोजून शंभर निरनिराळे फोटो काढून मगच थांबलो. तोपर्यंत त्या बाई आणि इतर लोकं निघून गेले होते. समाधानी होतो. सव्वा आठ वाजलेले. चहा प्यावासा वाटला. जवळचेच हॉटेल गाठलं. चहा पिल्यावर भुकेची जाणीव झाली. या फोटोग्राफी मुळे ही एक चांगली सवय लागलीये. सकाळी भूक लागते व मस्त नास्ता देखील होतो. इडली सांबारावर आडवा हात मारला. आणि सकाळचा उत्साह पुन्हा गायब झाला. घरी जाऊन पडावं वाटलं.

घरी येताना डी एस के च्या छोट्या घाटात दहा बारा फोटो काढले व परतलो.
आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले. सहा सात चांगले फोटो निवडून डेव्हलप केले. त्यातील एका फोटोवर मोबाईल मधील पिक्स आर्ट ऍप मधे Happy New Year चं टेक्स्ट टाकलं आणि आधी केदार सरांना व्हाट्सअप्प वर पाठवलं.


मग बाकीच्यांना आणि इतर ग्रुपला पाठवले. पुन्हा बाकीच्या पाच फोटोचं कोलाज तयार करून सगळ्यांना पाठवलं. तोवर साडे अकरा झाले. ऑफिसला हाफ डे ची सुट्टी असल्यामुळे इतकं करू शकलो होतो. अजून ऑफिसला वेळ होता. आधी डॉक्टराना गाठलं आणि मग ऑफिसला इच्छा नसताना रवाना झालो.